Description
Popular Prakashan Charimera by Sadanand Deshmukh
गेल्या पंचवीस-तीस वर्षांच्या काळात शेतीव्यवसायात टप्प्याटप्प्याने यांत्रिकीकरणाचा प्रभाव वाढत गेला. जागतिकीकरणाने गाव-खेड्यांत नवी आव्हाने निर्माण झाली. त्याचा बदलत्या समाजव्यवस्थेवर बरा-वाईट परिणाम झाला. आत्मीयता आणि विश्वास यांची जागा लूटमार आणि द्वेषभावनेने घेतली. शेतीचाही अन्य मार्गाने वापर करण्याचा विचार होऊ लागला. अशा खळबळजनक सामाजिक अवस्थांतरात एखादे कुटुंब शेती हाच व्यवसाय असूनही सुखी असते, तर काहींना शेती विकायला काढावी लागते. ही परिस्थिती पार्श्वभूमीला ठेवून या व्यवसायातली सकारात्मक बाब वाचकांच्या मनात पेरली जावी या भूमिकेतून सदानंद देशमुखांनी कलात्मक पातळीवर 'चारीमेरा' या कादंबरीची निर्मिती केली आहे. चारीमेरा म्हणजे शेताच्या चारही बाजू. शेताच्या सीमा निश्चित करण्याशी संबंधित असलेला हा अस्सल वैदर्भीय शब्द आहे. वेळच्या वेळी बांधबंदिस्ती करून चारीमेरा मजबूत ठेवाव्या लागतात; नाही तर शेताचा खंगळा झाल्याशिवाय राहत नाही. तोच नियम शेती कसणाऱ्याच्या मनालाही लागू पडतो. ही बाब उदेभान आणि भावनाताई या व्यक्तिरेखांच्या माध्यमातून या कादंबरीत ठळकपणे अधोरेखित होताना दिसते. आपला अनुभव आणि निष्ठा यांच्याशी प्रामाणिक राहून लेखकाने केलेले कृषीकर्माचे, निसर्गाचे, प्राणीविश्वाचे वर्णन लक्षणीय झाले आहे. त्याचप्रमाणे जातीयता, लोकमानस, स्त्रीमनाची भावनिक आंदोलने, सोशिकता आणि संघर्ष यांचे व्यामिश्र आणि बहुआयामी चित्रण या कादंबरीत येते. पात्रांच्या मानसिक स्थितीचे, भावभावनांचे दर्शन घडवण्यासाठी लेखकाने केलेला रूपक, प्रतिमा, प्रतीके यांचा वापर निवेदनाच्या भाषेलाही काव्यात्म परिमाण मिळवून देतो.